रविवार, २४ डिसेंबर, २०१७

राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी शौचालयासाठी श्रमदान करुन दिला ग्रामस्वच्छतेचा संदेश!




पार्डीतीखे गावात तालुक्यातील सरपंचाचा सत्कार व मार्गदर्शन

वाशीम: दि २४

कृषी, फलोत्पादन तथा पाणी पुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी जिल्ह्यातील पार्डी तिखे (ता. रिसोड) या गावाला भेट देऊन शौचालय बांधकामासाठी श्रमदान केले आणि ग्राम स्वच्छतेचा कृतीशील संदेश दिला.

यावेळी आमदार अमित झनक, पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुदाम इस्कापे, मंत्रालयातील डाॅ. विजय अंभोरे, पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता खान, उप कार्यकारी अभियंता निलेश राठोड, गटविकास अधिकारी भारसाकळे, पार्डी तिखे येथील सरपंच शेषराव अंभोरे, ऊत्तमरावजी तीखे ,महादेव शिंदे , सदाशिव तीखे, संजय तीखे , सचीन अंभोरे ,  शिवाजी तीखे, गजानन शिंदे , सुरेष तीखे यांची उपस्थाती होती.

यावेळी गावातील नागरिकांच्या वतीने काढण्यात आलेल्या स्वच्छता फेरीत सदाभाऊ खोत यांनी सहभाग घेतला होता. लोककलावंत केशव डाखोरे, विलास भालेराव, सुशिला घुगे, मधुकर गायकवाड, प्रज्ञानंद भगत, बेबीनंदा कांबळे, विद्या भगत, धम्मपाल पडघान आणि दौलत पडघान यांनी कलापथक सादरीकरणातुन स्वच्छतेबाबत जनजागृती केली तेव्हा राज्यमंत्री खोत यांनी या कलावंताचे कौतुक केले.

यावेळी आयोजित कार्यक्रमात पार्डी तिखे गावचे नवनिर्वाचित सरपंच शेषराव अंभोरे आणि परीसरातील ईतर उत्कृष्ट सरपंचांचा सत्कारही खोत यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मंत्री सदाभाऊ खोत यांनी उपस्थित सरपंच व गावातील नागरिकांना मार्गदर्शन केले. गावाचा सर्वांगिन विकास करायचा असेल तर गावातील हागणदारी हद्दपार करा असे सांगुन स्वच्छतेसाठी तरुणांनी पुढाकार  घेण्याचे आवाहन त्यांनी केले. 

*प्रसंगी कर्ज बुडवा, पण आत्महत्या करु नका!*राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी पार्डी तिखे या गावात स्वच्छतेबाबत श्रमदान करुन लोकांना मार्गदर्शनही केले. यावेळी त्यांनी शेतकर्‍यांच्या वाढत्या आत्महत्याबाबत चिंता व्यक्त करतांनाच शेतकर्‍यांनी खंबीर होऊन जगलं पाहिजे असे विचार व्यक्त केले. संपुर्ण जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी हा शावकाराच्या कर्जापाई आत्महत्या करीत असल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली आणि जवळ पैशेच नसतील तर सावकाराचे कर्ज बुडवा पण आत्महत्या करु नका असा संदेश त्यांनी आपल्या भाषणातुन दिला.

  कार्यक्रमाचे सुत्रसंचालन  प्रशांत शिंदे यांनी केले.  सरपंच शेषराव अंभोरे व जीतू अडलकर,  सतिष देशमुख, जिल्हा कक्षाचे प्रफुल्ल काळे, प्रदिप सावळकर यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पुढाकार घेतला. कार्यक्रमाला गावातील नागरिकांसह परीसरातील कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

सम्राट टाइम्स न्यूज नेटवर्क

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा