सोमवार, २५ सप्टेंबर, २०१७

जिद्द आणि संघर्षांची अनोखी कहाणी* *मजुराची बायको झाली पोलिस उपनिरिक्षक



हुकमत मुलाणी ,उस्मानाबाद

     ही गोष्ट म्हटली तर अगदी सोपी आणि म्हटली तर खुप काही सांगून जाणारी. एका मजूरी करणाऱ्या माणसाची  पत्नी गावकुसाबाहेरच्या पालावर राहणाऱ्या या  कुटुंबाने जगासमोर आदर्श निर्माण केला आहे. दोन लहानगी लेकर घेऊन संसाराचा गाडा ओढताना या पती-पत्नीने यातून बाहेर पडण्याची जी असामान्य धडपड केली तिला आज यश आले आहे. त्या मजूराच्या पत्नीने पदवी परिक्षा उत्तीर्ण तर केलीच पण त्यांनतर तिने चक्क पोलिस दलात अधिकारी पदाची नोकरी मिळवली आहे. ही कहाणी आहे *पद्मशीला तिरपुडे* या सामान्यांतील असामान्य महिलेची. महाराष्ट्र पोलिस अकादमीत नुकत्याच झालेल्या उपनिरिक्षकांच्या तुकडीचा दीक्षान्त सोहळा या यशस्विनीसाठी आयुष्यातील परमोच्च आनंदाचा- अभिमानाचा ठेवा ठरलाच तसाच तो अनेकांना प्रेरणा देणारा क्षण होता. तो अनुभवण्यासाठी तिने प्रचंड संघर्ष केला त्याचीच ही सुखद परिणीती होती. राज्याच्या पोलिस दलास आजवर उपनिरीक्षक दर्जाचे २४ हजार अधिकारी देणाऱ्या महाराष्ट्र पोलिस अकादमीची यंदाची १०८ वी तुकडी अनेक बाबतीत वैशिष्ट्यपूर्ण ठरली. या तुकडीने सर्वाधिक १,५४४ फौजदार दिले आणि त्यात १२० महिला पोलिस अधिकारी आहेत. त्यापैकीच एक असलेल्या *पद्मशीला* यांचा दहा वर्षांतील प्रवास अनेकांना प्रेरणादायी आहे.
मुळच्या *भंडारा जिल्ह्यातील असलेल्या पद्मशीला रमेश तिरपुडे यांचा त्याच जिल्ह्यातील वाकेश्वरजवळच्या पहेला गावातील पवन तुकाराम खोब्रागडे यांच्याशी दहा वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता.* त्या सांगतात “पोलिस अधिकारी" व्हायचं स्वप्न पूर्ण झालं, याचा आनंद आहे. पण, त्याचं सगळं श्रेय पतीलाच आहे. त्यांनी खुप सोसलंय. हमाली केली, समोसे विकले, मजुरी केली. त्यांनी घेतलेले सगळे कष्ट आज कामाला आले. पद्मशीला तिरपुडे, (पोलिस उपनिरीक्षक) सांगतात. “आयुष्यात एक दिवस असा आला की, घरात अन्नाचा दाणाही नव्हता. उसने आणलेले पन्नास रुपये बाजारात हरवले. खुप वाईट वाटले. खुप रडलो तसेच उपवाशी झोपलो, पण त्या दिवशीच निश्चय केला की, मोठ्ठ अधिकारी व्हायचं." पद्मशीला शिकल्या अन् मोठी अधिकारी व्हायचं या स्वप्नासाठी त्यांनी खुप कष्ट केले. घरची परिस्थिती फारच हलाखीची होती. पद्मशीला यांचे पती पेव्हर ब्लॉकचे मजुरीचे काम करुन घर चालवत होते.
नाशिकच्या गोदावरीच्या काठावरील एका पालामध्ये दोन लहानग्यांसह त्यांनी संसार थाटला होता. पण त्यांच्या मनात यातून बाहेर पडण्याची, भरारी घेण्याची जिद्द होती, त्यांना त्यांच्या पतीची साथ होती त्यामुळे अनेक आव्हानांशी लढत त्यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले. त्यांनतर एमपीएससीच्या परिक्षेत उत्तीर्ण होत त्यांची निवड राज्य पोलिस दलात आज उपनिरिक्षक पदावर झाली आहे. जीवनात वाईट स्थिती आली म्हणून तिथेच न थांबता त्यांनी दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर चक्क पोलिस फौजदार होवून अनेक जणींसमोर आदर्श तर ठेवलाच आहे पण स्वत:च्या जीवनाला असामान्य वळण देण्याची किमया साधली आहे.
*त्यांच्या या कर्तृत्वाला सलाम!!!*


*हुकमत मुलाणी,उस्मानाबाद
मो- 8379832200

२ टिप्पण्या: