विनोद तायडे वाशिम
वाशिम, दि. २५ : ‘गट शेतीस प्रोत्साहन व सबलीकरणासाठी शेतकऱ्यांच्या गट शेतीस चालना’ ही राज्य पुरस्कृत योजना सन २०१७-१८ व २०१८-१९ या दोन वर्षाच्या कालावधीत पथदर्शी प्रकल्प म्हणून राबविण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकरी गटांनी दि. ६ ऑक्टोंबर २०१७ पर्यंत प्रकल्प अहवाल सादर करणे आवश्यक असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
गट शेतीस प्रोत्साहन व सबलीकरणासाठी शेतकऱ्यांच्या गट शेतीस चालना योजनेतंर्गत किमान २० शेतकऱ्यांच्या समुहाच्या माध्यमातून किमान १०० एकर क्षेत्रावर शेतकरी गटामर्फात विविध कृषि व कृषिपुरक उपक्रम प्रकल्प राबविणे आवश्यक आहे. हा समूह शेतीचा प्रयोग एक शिवारातील संलग्न भौगौलिक क्षेत्रामध्ये सामुहिकरित्या नियोजनबध्द शेती करणारा असावा. या योजनेतंर्गत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांची आत्मा संस्था, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १८९० अथवा कंपनी अधिनियम १९५८ च्या तरतुदी अंतर्गत शेतकरी उत्पादक कंपनी किंवा गट म्हणुन नोंदणी करणे आवश्यक राहील. या योजनेतर्गंत सामुहिक सिंचन सुविधा, सामुहिक पध्दतीने यांत्रिकीकरणाद्वारे मशागत करणे शक्य असल्याने समूह शेतीस प्राधान्य देण्यात येणार आहे. गट शेती या योजनेतंर्गंत प्रकल्प स्वरुपात उपक्रम राबविण्यात येणार आहेत. तसेच शेतकऱ्यांना प्रशिक्षण व मार्गदर्शन देण्यात येईल.
शेतकऱ्यांच्या गटांना प्रगतशील क्षेत्राचे तंत्रज्ञान देण्यासाठी शेतीविषयक तांत्रिक सल्लागारांची सेवा या योजने अंतर्गत उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. शेतीपूरक जोडधंदा जसे की, सामुहिक गोठा, दुग्धप्रक्रिया, अवजारे, मत्स्यपालन, मधुमक्षिकापालन, रेशिम उद्योग, कुक्कुटपालन तसेच मागेल त्याला शेततळे, जलसंपदा विभागाकडील कामे इ. कार्यक्रम कृषि सलग्न संबंधित विभागाकडून त्या विभागाच्या प्रचलित निकषाप्रमाणे समूह गटास प्राधान्याने उपलब्ध करुन देण्यात येतील. बँकेत प्रकल्प आराखडा सादर केलेल्या अथवा करणाऱ्या गटास प्राधान्य देण्यात येईल. ज्या तालुक्यात महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषि विकास प्रकल्प (एमएसीपी) किंवा अन्य योजना अथवा प्रकल्पांतर्गत शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन झालेल्या नाहीत, अशा तालुक्यात सदर योजनेत प्राधान्य देण्यात येईल. ज्या गटाचे प्रकल्प आराखडे सर्व अटी व शर्तीची पूर्तता करतील, अशा गटांना प्राधान्य दिले जाणार आहे.
प्रकल्प आराखड्यामध्ये समुह शेती क्षेत्रात घ्यावयाची पिके, फळे, भाजीपाला, मसाला पिके, फुलशेती व इतर अवश्यक असलेले उत्पादन. त्याकरीता लागणाऱ्या सुविधा शेतकऱ्यांना प्रशिक्षण, सिंचन सुविधा, संरक्षित शेती, सुक्ष्मसिंचन, यांत्रिकीकरणासाठी आवश्यक अवजारे, काढणीपश्चात लागणारी उपकरणे यांचा आवश्यकतेनुसार समावेश करण्यात यावा. तसेच या आराखड्यात शेतकरी गटाकडील उपलब्ध साधनसामुग्री (सुविधा)यासह जमीन सुधारणा, समतलीकरण, सामुहिक सिंचन व्यवस्था निर्मीती, यांत्रिकीकरण व तंत्रज्ञानाबाबत शेतकरी समुह गटाकडे उपलब्ध असलेली यंत्रसामुग्री व तंत्रज्ञान, सामुदायीक संकलन, प्रतवारी साठवणूक व प्रक्रिया केंद्राची निर्मिती, विपणानाबाबत शेतकरी ग्राहक शृखंला विकसित करणे, सामुहिक पशुधन व्यवस्थापन आदी बाबींचा समावेश असणे आवश्यक आहे.प्रकल्पाचा आराखडा तयार करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शनासाठी संबधित तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा व प्रकल्प आराखडा तयार करून दि. ६ ऑक्टोंबर २०१७ पर्यंत तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे सादर करावा, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी कळविले आहे.
विनोद तायडे वाशिम
8888277765
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा